
लातूर : रासायनिक खतांच्या किमती आधीच असताना खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये ५० रुपयांपासून ते २४० ते २५५ रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतक-यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
शेतकरी अगोदरच त्याच्या शेतमालाला भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. वाढलेल्या महागाईने त्रस्त झालेल्या शेतक-यांना आता नव्या वर्षात वाढणा-या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. हवामान बदलामुळे शेतक-यांना अगोदरच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यातच आता वाढणा-या रासायनिक खतामुळे शेतक-यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरून काढावे, हा प्रश्न शेतक-यांना सतावत असताना कसेबसे रब्बी हंगामात पेरणी केली. त्यातच ढगाळ वातावरण असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला. आता अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.